कोकण विभाग

वंदे भारत एक्सप्रेस गाडीला चिपळूण रेल्वे स्थानकात थांबा मिळावा आ.शेखर निकम यांची कोकण रेल्वे व्यवस्थापकीय संचालक संतोष कुमार झा यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी

चिपळूण/ प्रतिनिधी: [ विलास गुरव] चिपळूण रेल्वे स्थानकावर वंदे भारत गाडीला थांबा मिळावा, अशी मागणी आमदार शेखर निकम यांनी निवेदनाद्वारे कोकण रेल्वेचे व्यवस्थापकीय संचालक संतोष कुमार झा यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

 

कोकण रेल्वे मार्गावर वंदे भारत एक्सप्रेस गाडीला चिपळूण रेल्वे स्थानकावर थांबा मिळावा यासाठी प्रवाशांमधून जोरदार मागणी होत आहे. मात्र, अजूनही या गाडीला चिपळूणमध्ये थांबा मिळालेला नाही. या विषयात आमदार शेखर निकम यांनी लक्ष घातले असून कोकण रेल्वेचे व्यवस्थापकीय संचालक संतोष कुमार झा यांना नुकतेच निवेदन दिले. यानुसार रेल्वे प्रशासनाने इतर मेल व एक्सप्रेस रेल्वे गाड्यांना केरळ, कर्नाटक, तामिळनाडू या राज्यात १०० कि.मी.च्या आत थांबे दिले आहेत. वंदे भारत या गाडीला खेड येथे थांबा दिला आहे. त्याबद्दल रेल्वे प्रशासनाचे कौतुक करतो. परंतु चिपळूण येथे वंदे भारत गाडीला थांबा देण्यात आला नाही, असे या निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

चिपळूण रेल्वे स्थानक हे रत्नागिरी जिल्ह्यातील एक प्रमुख मध्यवर्ती रेल्वे स्थानक असून रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागर, संगमेश्वर, चिपळूण व खेड तालुक्यातील चिपळूण शहरालगतच्या गावातील असंख्य प्रवासी चिपळूण रेल्वे स्थानकावरुन प्रवास करतात. चिपळूण शहरालगत असणा-या विविध औद्योगिक कंपन्यांमुळे व पर्यटन क्षेत्रामुळे चिपळूण रेल्वे स्थानक हे व्यापार, उद्योग व पर्यटनासाठी एक महत्वाचे रेल्वे स्थानक आहे. चिपळूण रेल्वे स्थानकांवर रेल्वे गाड्यांना पाणी भरून दिले जात असलेने या रेल्वे स्थानकाला अनन्य साधारण महत्व आहे. वंदे भारत ही गाडी चिपळूण रेल्वे स्थानकात न थांबल्यास या परिसरातील असंख्य नागरिक लांब पल्याच्या जलद प्रवासापासून वंचित राहणार आहेत. वंदे भारत या गाडीला चिपळूणसारख्या रत्नागिरी जिल्ह्याच्या मध्यवर्ती रेल्वे स्थानकावर थांबा न देणे म्हणजे कोकणाच्या विकासाला खिळ घालणे समान आहे.

तरी या बाबींचा विचार करून पर्यटन, व्यापार व उद्योग वाढीच्या व प्रवासाच्या दृष्टीने वंदे भारत या रेल्वे गाडीला चिपळूण रेल्वे स्थानकावर थांबा देण्यात यावा, अशी मागणी निकम यांनी निवेदनाद्वारे केली आहे.